मुंबई : सणासुदीच्या काळात रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्का कपात करून सर्वसामान्य ग्राहकांना दिवाळी भेट दिली आहे. त्यामुळे गृह आणि वाहन कर्जदरात घट होणार असून, कर्जाचा हप्ता कमी होणार असल्याने कर्जदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. शुक्रवारी, चार ऑक्टोबर रोजी झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्का (२५ आधारभूत अंक) कपात केली.
हा दर आता ५.४० टक्क्यांवरून ५.१५ टक्के झाला आहे. २०१९ मधील ही सलग पाचवी दर कपात असून, २०१० नंतरचा हा सर्वात कमी रेपो दर आहे.
रिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रेपो दरात कपात केली असून, तो आता ४.९० टक्के झाला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाचा गृहबांधणी क्षेत्राला चांगला लाभ होणार आहे.